इंडोनेशियात बाली येथे 13 - 14 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित जी 20 कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित राहिले.
अर्थव्यवस्था अधिक लवचिक, न्याय्य आणि शाश्वतरित्या पूर्वपदावर आणणे सुनिश्चित करण्यासाठी, महामारीनंतरच्या काळात रोजगार निर्मिती, सामाजिक संरक्षण, कौशल्य आणि औपचारिकीकरणाशी संबंधित प्रतिसादात्मक आणि बळकट धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत बोलताना अधोरेखित केले.
कामाच्या सतत बदलत्या जगतात महत्त्वाची असलेली प्राधान्य क्षेत्रे निश्चित केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी इंडोनेशियाची प्रशंसाही केली. दिव्यांग व्यक्तींसाठी श्रम बाजारपेठेचे एकात्मीकरण, समुदाय आधारित व्यावसायिक प्रशिक्षण यांना चालना देऊन मानवी क्षमता विकासामध्ये शाश्वत वाढ आणि उत्पादकता, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) रोजगार निर्मितीचे साधन म्हणून सहाय्य करणे आणि सर्व कामगारांसाठी अधिक प्रभावी संरक्षण आणि लवचिकता वाढवण्यासाठी श्रम संरक्षणाचा अवलंब करणे याचा यात समावेश आहे. या सर्व क्षेत्रात भारताच्या सामान्य कामगिरीकडेही केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी जर्मनी, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात , सौदी अरेबिया, नेदरलँड आणि तुर्की या देशांसह अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या. या सर्व बैठकांमध्ये यादव यांनी भारताचे आगामी अध्यक्षपद आणि व्यापक प्राधान्यक्रमांची माहिती दिली आणि आपल्या उद्दिष्टांसाठी या देशांच्या आणि संस्थांच्या समर्थनाची मागणी केली. आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी स्थलांतर आणि वाहतूक करार तसेच सामाजिक सुरक्षा करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
