पुरी येथे ६ फेब्रुवारीपासून भारतीय मजदूर संघाची २१ वी अखिल भारतीय परिषद

मुंबई : श्रमिकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटना भारतीय मजदूर संघ (बीएमएस) यांची २१ वी अखिल भारतीय परिषद ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ओडिशातील पवित्र तीर्थनगरी पुरी  येथे आयोजित करण्यात येणार आहे असे वृत्त तरुण भारत मुंबई वृत्तसंस्थेने दिले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेत देशातील श्रमविश्वाशी संबंधित अनेक ज्वलंत व समकालीन विषयांवर सखोल चर्चा आणि विचारमंथन होणार आहे. बदलती तंत्रज्ञानव्यवस्था, पर्यावरणीय आव्हाने, जागतिकीकरण तसेच कामगार कायद्यांचा परिणाम हे विषय अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असतील.

याबाबत माहिती देताना भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन यांनी भुवनेश्वर येथील प्रेस क्लब ऑफ ओडिशा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, ही परिषद केवळ कामगार संघटनांसाठीच नव्हे तर देशाच्या श्रमधोरणाला व औद्योगिक भविष्याला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुखभाई मांडविया यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालक मिचिको मियामोटो या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाअंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून निवडलेले सुमारे २,५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी २८ राज्ये, ४ केंद्रशासित प्रदेश आणि ४२ औद्योगिक महासंघांचे प्रतिनिधित्व करतील. विविध राज्यांतील प्रमुख कामगार संघटनांचे कार्यकर्ते, औद्योगिक महासंघांचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ट्रेड युनियन नेते परिषदेत सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी ४०० हून अधिक स्वयंसेवक सक्रियपणे तयारीत गुंतले आहेत.

परिषदे दरम्यान देशातील विद्यमान श्रमपरिस्थिती, केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या श्रमसंहितांचा विविध क्षेत्रांवरील परिणाम, रोजगाराचे बदलते स्वरूप, कंत्राटी कामगार, गिग वर्क तसेच ट्रेड युनियनची भविष्यातील भूमिका या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तज्ज्ञ वक्ते आणि कामगार नेते या विषयांवर आपले विचार मांडतील.

या पत्रकार परिषदेला भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री गणेश मिश्रा, प्रदेशाध्यक्ष बादल महाराणा, प्रदेश महामंत्री पृथ्वीराज पंडा तसेच राष्ट्रीय मंत्री अंजली पटेल उपस्थित होते. यापूर्वी बीएमएसचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेऊन 'प्रौद्योगिकी, अर्थव्यवस्था, पर्यावरण व नैतिकतेच्या बदलत्या परिदृश्याचा कार्यजगतावर होणारा परिणाम आणि ट्रेड युनियनची भूमिका' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी विशिष्ट अतिथी (गेस्ट ऑफ ऑनर) म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली आहे.

१२ देशांतील प्रतिनिधी, ब्रिक्स देशांचा विशेष सहभाग

बीएमएसच्या राष्ट्रीय संघटन मंत्र्यांनी सांगितले की, या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्यापक प्रतिसाद मिळणार आहे. ब्रिक्स देशांसह एकूण १२ देशांतील भगिनी संघटनांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. 'बदलते तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय व नैतिक परिदृश्य : कार्यजगतावर होणारा परिणाम आणि ट्रेड युनियनची भूमिका' या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यात जागतिक श्रमपरिस्थिती आणि ट्रेड युनियनच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा होईल.

महिला सहभागावर राष्ट्रीय परिसंवाद

श्रमक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने परिषदेतत एक विशेष राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. 'ट्रेड युनियन चळवळीत महिलांचा वाढता सहभाग : आव्हाने व संधी' या विषयावर होणाऱ्या या परिसंवादात महिला कामगारांची भूमिका, त्यांचे हक्क, समस्या आणि संधी यांवर चर्चा होईल. या प्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती व्ही. राहटकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ओडिशात दुसऱ्यांदा अखिल भारतीय अधिवेशन

बी. सुरेंद्रन यांनी सांगितले की, यापूर्वी ओडिशामध्ये भारतीय मजदूर संघाची अखिल भारतीय परिषद २००८ मध्ये कटक येथे आयोजित करण्यात आली होती. सुमारे १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा ओडिशाला या प्रतिष्ठित राष्ट्रीय अधिवेशनाचे यजमानपद मिळाले आहे. सध्या पुरी येथे अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.