अमरावती : रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्त कामगारांना पुढील वर्षात वेतनवाढ देण्याच्या आश्वासनावर त्यांची मागील वर्षी व्यवस्थापनाने बोळवण केली मात्र यावर्षी वेतनवाढीचा मुद्दा कामगारांनी पुढे केल्यावर व्यवस्थापन मात्र कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार पुढे आला आहे असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.
व्यवस्थापनाने मागील वर्षी परप्रांतीय आणि मर्जीतील कामगारांना वेतनवाढ दिली मात्र आश्वासनानुसार यावर्षी कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त कामगार परिवारासह उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत.
गतवर्षी रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील व्यवस्थापनाने मर्जीतील कामगारांची वेतनवाढ केली त्यामुळे संतप्त स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी आमचीही वेतनवाढ करावी अशी मागणी केली तेव्हा व्यवस्थापनाने सर्व कामगारांना पुढील वर्षी निश्चित वेतनवाढ देऊ असे लेखी पत्र कामगार आयुक्तांसमोर कामगारांना दिले होते.वर्ष उलटून गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त कामगारांनी पुन्हा वेतनवाढीसाठी एप्रिल महिन्यापासून निवेदने आणि पत्रव्यवहार सुरू केला मात्र व्यवस्थापन आता दिलेल्या अश्वासनावर पाणी फेरत असून वेतनवाढीचा विषय रेटून धरणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी सुद्धा देण्यात येत आहे.
तीन महिन्यांपासून व्यवस्थापन आणि कामगार असा वाद सुरू असुन यामध्ये संघर्ष निर्माण होणार एवढे मात्र निश्चित आहे. कामगार अधिकारी, कामगार आयुक्त बघ्यांची भूमिका घेत असल्याने कामगार मात्र एकाकी पडलेला आहे. कामगार आपल्या निर्णयावर ठाम असून वेतनवाढ न दिल्यास कामगार वर्ग आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसणार एवढे मात्र नक्की आहे. रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील व्यवस्थापन परप्रांतीय कामगारांना तुपाशी आणि स्थानिक कामगारांना उपाशी ठेवण्याचा प्रकार करत असल्याने कामगार आयुक्तांनी या व्यवस्थापनावर चाप लावणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही. पुढील काही दिवसात वेतनवाढीचा प्रश्न निकाली न निघाल्यास मोठा संघर्ष उद्भवणार आहे.