भारतीय मजदूर संघाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त ‘संदेश यात्रा’द्वारे कंत्राटी कामगारांमध्ये जनजागृती
पुणे : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 31 मे व 1 जून 2025 रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील 28 जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मा. राजेंद्र पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. "वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून, कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात येतील," असे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी मा. सि. वि. राजेशजी यांचीही उपस्थिती होती.
ऊर्जामंत्र्यांच्या घोषणांवर अंमलबजावणीचा अभाव
संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी बैठकीत नमूद केले की, “ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2024 मध्ये 42,000 कंत्राटी वीज कामगारांसाठी जाहीर केलेले लाभ अजून प्रत्यक्ष अंमलात आलेले नाहीत. प्रशासनाने अद्याप त्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचलेले नाहीत.” त्यांनी असेही प्रश्न उपस्थित केला की, "प्रशासन आर्थिक हितसंबंधांमुळे दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे का?" यामुळे ऊर्जामंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघाचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले की, जर कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.
‘संदेश यात्रा’द्वारे जनजागृती अभियान
भारतीय मजदूर संघाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त 'कंत्राटी कामगार संदेश यात्रा' देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांशी थेट संपर्क साधून मेळावे व संवाद सत्र आयोजित केले जातील. वीज, जलसंपदा, आरोग्य, परिवहन, बांधकाम यासारख्या क्षेत्रांतील कामगारांमध्ये संघटनात्मक बळकटी आणि हक्कांविषयी जागृती हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असेल.
बैठकीचा समारोप करताना कंत्राटी कामगार, शोषण मुक्त कामगार या करिता संघर्ष करण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संगठन सचिव सी व्ही राजेश यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे. आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष सागर पवार यांनी केले आहे .
या बैठकीत खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या :
- ई.एस.आय. (कर्मचारी राज्य विमा योजना) अंतर्गत वेतन मर्यादेत वाढ करून अधिक कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा.
- वीज क्षेत्रातील कामगारांसाठी, हे काम धोकादायक उद्योग म्हणून घोषित करून स्वतंत्र वेतन अधिनियमांतर्गत विशेष सुरक्षा लाभ त्वरित लागू करावेत.