...अखेर बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्याचा निघाला आदेश, कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांच्या आंदोलनाला यश

वर्धा : गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र नाकारले जात होते. त्यामुळे हजारो मजुरांना शासकीय योजनांचा लाभघेता येत नव्हता. या अन्यायाविरुद्ध स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा असंघटित कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी आंदोलन उभारलेले होते. जिल्हा परिषदेने प्रमाणपत्र देण्याबाबतचा आदेश काढल्यामुळे आंदोलन यशस्वी झाले आहे.

     अग्निहोत्री यांनी या मुद्यावर गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद, वर्धा येथे वेळोवेळी निवेदने दिली. गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांनी सातत्यपूर्ण आणि संघर्षशील भुमिका घेतल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३० मे रोजी आदेश काढून सर्व गटविकास अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील पात्र बांधकाम कामगारांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच यामध्ये कोणतीही टाळाटाळ अथवा विलंब केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्यामुळे आंदोलनाला यश आले आहे. या निर्णयामुळे आता ग्रामीण मजुरांना बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. या योजनांमध्ये अपघात विमा, शिक्षण सहाय्य, वैद्यकीय मदत, गृहबांधणी अनुदान अशा महत्त्वपूर्ण सवलतींचा समावेश आहे.

मजुरांच्या न्यायासाठी उभारलेल्या संघर्षाचे फळ

हा निर्णय केवळ कागदोपत्री नाही, तर तो ग्रामीण मजुरांच्या न्यायासाठी उभारलेल्या संघर्षाचे फळ आहे. आमचा लढा इथवर थांबणार नाही तर अजूनही जे मजूर हक्कांपासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी संघटना रस्त्यावर उतरण्यास तयार आहे, असे अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.