खासगीकरण करा, पण गिरण्या पुन्हा सुरू करा; एनटीसी कामगार संघटनेची मागणी

मुंबई : पाच वर्षांपूर्वी बंद झालेल्या गिरण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) च्या २२ गिरण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार संघटनांनी केली आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विधान परिषद सदस्य व २२ एनटीसी गिरण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल कोऑर्डिनेशन अॅिक्शन कमिटीचे प्रमुख सचिन अहीर यांनी म्हटले की, या गिरण्यांचे खासगीकरण करणे हादेखील एक पर्याय ठरू शकतो 

    २०२० मध्ये बंद झालेल्या या गिरण्या सुरू झालेल्या नाहीत, असे अहीर यांनी सांगितले. यामुळे २० हजारांहून अधिक कामगार व त्यांची कुटुंबे अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत, असे ते म्हणाले असे वृत्त नवशक्ति वृत्तसंस्थेने दिले आहे.

    नऊ राज्यांतील एनटीसी गिरण्यांचे कामगार संघटना एकत्र येऊन ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असे अहीर यांनी सांगितले. गिरण्या पुन्हा सुरू कराव्यात आणि कामगारांना पूर्ण पगार मिळावा. आमच्या आंदोलना नंतर सरकारने अर्धा पगार देण्याचे मान्य केले, पण मागील आठ महिन्यांपासून तेही मिळालेले नाही, असे अहीर म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून दोन कोटी रुपयांहून अधिक बोनस रखडलेला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सरकारने या गिरण्यांचे खासगीकरण किंवा सरकारी-खासगी भागीदारीत सुरू ठेवण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी अहीर यांनी केली. या गिरण्यांच्या मालमत्तेची किंमत ५ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे, असेही ते म्हणाले.

   गिरण्या शासकीय रुग्णालये व संस्था यांच्यासाठी कपडे पुरवायच्या. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकून होते. सरकारने मुंबईतील एनटीसी गिरण्यांमधून मिळालेली टीडीआर निधी हस्तांतरित केला असता, तर गिरण्या पुन्हा सुरू होऊ शकल्या असत्या, असे अहीर यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील पाच गिरण्या

मुंबईतील टाटा, इंदू नं. ५, पोदार आणि दिग्विजय गिरणी तसेच अचलपूरमधील बार्शी टेक्सटाईल आणि फिनले टेक्सटाईल या महाराष्ट्रातील पाच गिरण्या समाविष्ट आहेत. या पाच गिरण्यांमध्ये २ हजार ते ३ हजार कामगार कार्यरत आहेत.