वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

    वाळूज औद्योगिक परिसरातील सी सेक्टर प्लॉट नंबर 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या 'सनशाइन इंटरप्राईजेस' कंपनीमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या कंपनीत रबरी हँडग्लोज बनविण्याचे काम केले जाते. कंपनीतील बहुतांश कामगार हे बिहारमधील आहेत. या कंपनीत सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. त्यापैकी 10 कामगार कंपनीमध्येच राहतात. हे कामगार झोपेत असताना अचानक आग लागली. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने उड्या मारल्या. तर आगीने भडका घेतल्याने सहा कामगार आतच अडकले. मात्र सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

    भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.