कामगारांच्या प्रश्नी आमदार सुनील शेळके आक्रमक, जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांचे कुटुंबीयासहित बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात

पुणे : जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांनी त्यांच्या न्याय व हक्कांसाठी संपुर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर 'बेमुदत साखळी उपोषणास' सुरुवात केली या उपोषणस्थळी आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली 

    यावेळी सुनील शेळके म्हणाले कि, कामगारांच्या संघर्षात नेहमीच सोबत होतो आणि शेवटपर्यंत सोबतच राहील. राज्य सरकारने एकाच बाजूने विचार न करता कामगारांना सकारात्मक न्याय मिळेल आणि नवीन येणाऱ्या कंपनीच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही यासाठी लवकरात लवकर मार्ग काढावा .तसेच येत्या दहा तारखेपर्यंत जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर जी परिस्थिती उद्भवेल त्याला राज्य सरकार व कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील.

    पुढे म्हणाले कि, जनरल मोटर्स ही आपल्या एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते.परंतु कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे.कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले.सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातो. तर आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाही,कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत.

     परंतु कंपनीने मात्र या गोष्टींचा कुठलाही गांभीर्याने विचार न करता प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला.यामुळे कामगार बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत.अशाच पद्धतीने जर कंपन्या फक्त स्वहिताचा निर्णय घेत असतील तर भविष्यात सर्वच कामगारांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि अशीच वेळ दुसऱ्या कामगारांवर देखील येऊ शकते.कामगारांच्या हक्कासाठीचा असणारा हा लढा लढण्यासाठी सर्वांनी एकजूटीने राहणे गरजेचे आहे असेही आमदार सुनील शेळके म्हणाले. यावेळी हजारो कामगार त्यांच्या कुटुंबीयांसहित उपोषण स्थळी उपस्थित होते.