न्याय हक्कांसाठी वीज कंत्राटी कामगारांचा प्रकाशगडला घेराव

महावितरण महापारेषण व महानिर्मिती या कंपनीमध्ये सुमारे 40,000 कंत्राटी कामगार लाइनमन, ऑपरेटर, लिपिक, शिपाई, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, मीटर रीडर इत्यादी पदांवर सुमारे दहा ते वीस वर्षापासून वीज कंपनीतील या विविध नियमित रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत आहेत.

    भरती मध्ये प्राधान्य नाही, आरक्षण नाही, वयात सवलत नाही, भरतीचे निकष चुकीचे कोविड काळात 55 कामगार मृत्युमुखी पडले तरी मदत नाही, कंत्राटदार बदलला की पुन्हा कामासाठी 30 ते 40 हजारांची मागणी होते, पगारातून अनधिकृत कपात, भविष्य निर्वाह निधीवर डल्ला, कोऱ्या चेक व पेपर वर सह्या घेणे,रोजगाराची सुरक्षा नाही, वर वसुली झालीच पाहिजे, 24 तास कामाला बांधील राहिले पाहिजे, ना पेट्रोलभत्ता ना फोन भत्ता, बिन पगारी फुल अधिकारी अशी अवस्था वीज कंत्राटी कामगारांची आज झाली आहे असे संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात म्हणाले.

    दोन वर्ष मा.ऊर्जामंत्री ना.नितीनजी राऊत यांच्याकडे अनेक पत्रव्यवहार झाले, निवेदने दिली, आंदोलने केली, प्रत्यक्ष भेट घेतली मात्र मंत्रिमहोदयांना आपल्याच ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही या मुळे काही कंत्राटदार व प्रशासकीय अधिकारी संगनमताने शासकीय निधीची लूट करत आहेत याकडे ऊर्जामंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. दोषींवर कारवाई करायचे सोडून कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री अभय देत आहेत का? असा सवाल संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व यांनी उपस्थित केला आहे. 

      महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मा.विजय सिंघल यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष नीलेश खरात, मुंबई अध्यक्ष सुनील कांबळे व कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णाजी देसाई यांच्या सोबत चर्चा केली कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके,सागर पवार कोषाध्यक्ष, मुख्यालयातील प्रशांत भांबुर्डेकर उपस्थित होते. संघटनेने एचडीएफसी बँकेच्या मार्फत  तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 11 लाखाचा विमा करण्याचा करार झाला,असून या बाबत कंपनी तर्फे संबंधितांना सूचना दिल्या जातील. तसेच दिवाळी पूर्वी वेतन देण्याबाबत सूचना दिल्या जातील व नोव्हेंबरमध्ये कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत मिटिंग घेण्यात येईल आश्वासन दिले.

    राज्यभरातून सुमारे 3000 हजार कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते प्रशासन व शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास  आगामी काळात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे ( संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे. या वेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस मोहन येणुरे, मुंबई अध्यक्ष बापु दडस यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. 

     शासनावर आर्थिक बोजा येणार नाही व या कामगारांच्या बहुतांश समस्या सुटतील अशा उपाय योजना सुचवल्या असून मुख्यमंत्री यांनी मध्यस्ती करून सकारात्मक तोडगा काढावा ही अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार, यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्युत कंपनी मधील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.