ESIC मध्ये 30 हजार रुपये पगार मिळवणारे कर्मचारी होणार सामील !

नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अशी माहिती समोर आली आहे की राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ESIC) वैद्यकीय योजनेची व्याप्ती वाढू शकते. या योजनेअंतर्गत रु .30 हजारांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या, ESIC चा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतो ज्यांना 21 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. 

     हा नवीन प्रस्ताव ईएसआयसी बोर्डाच्या बैठकीत ठेवला जाईल, याठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. जर हा प्रस्ताव मंजुर झाला तर 20-25 टक्के कर्मचारी या योजनेच्या अखत्यारीत येतील.

ESIC योजनेअंतर्गत लाभ :

सध्या, ESIC योजनेच्या सदस्याच्या पगारामध्ये 0.75 टक्के हिस्सा घेतला जातो, तर 3.25 टक्के नियोक्त्याकडून घेतला जातो. ESIC योजनेअंतर्गत देशात 6 कोटी कर्मचारी आहेत. सध्या या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ग्रॅच्युइटी भरण्यासाठी किमान सेवा आवश्यक नाही. EPF आणि MP कायद्यातील तरतुदींनुसार कौटुंबिक पेन्शन दिले जात आहे. जर कर्मचारी आजारी असेल आणि कार्यालयात येत नसेल तर एकूण वेतनापैकी 70 टक्के रक्कम वर्षातील 91 दिवस आजारपण लाभ म्हणून दिली जाते.

ESIC च्या नवीन योजना :

ESIC ची नवीन योजना कोविड पेन्शन रिलीफ स्कीम (CPRS) कोविडमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आजीवन पेन्शन देते. त्याची रक्कम किमान 1800 रुपयांपासून ते मृत कामगारांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% पर्यंत असू शकते. ही योजना 24 मार्च 2020 पासून दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.