टोयोटा किर्लोस्कर कारखान्यातील संप चार महिन्यानंतर मिटला

बंगळुरु - बिदाडी येथील टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीच्या कारखान्यात गेल्या चार महिन्यापासून कामगारांनी पुकारलेला संप मिटला असल्याची माहिती कंपनीने दिली. व्यवस्थापन आणि कामगारात मतभेद निर्माण झाल्यानंतर कंपनीने टाळेबंदी जाहीर केली होती.

कामगार संघटनेने औपचारिकरित्या संप मागे घेतला असून एकूण ३,३५० कामगारांपैकी बहुतांश कामगार कामगार कामावरती रुजू झाले असून उर्वरित कामगार कामावर येतील. कर्नाटक सरकार आणि कामगार मंत्रालयाने या प्रकरणात मध्यस्थी करून परिस्थिती हाताळल्यामुळे हे शक्‍य झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कामगारांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन एक मार्च रोजी कंपनीने स्वीकारले. त्यानंतर पाच मार्च रोजी सर्व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. आता कामगारांनी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. कंपनी बिदाडी येथे वर्षाला ३.१० लाख वाहनांची निर्मिती होते.