कृत्रिम बुद्धिमतेमुळे (Artificial Intelligence) कार्ये बदलेल, रोजगार नाही

मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वाफेवरील इंजिनापासून,इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि सध्याच्या युगातील डिजिटल-विश्व (Digital World) निर्माण असा प्रवास पूर्ण केला आणि आता शेवटच्या टप्यात त्याच मानवी बुद्धिमत्तेची प्रतिकृती मशीन्समध्ये आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या तंत्रज्ञानालाच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशिल इंटेलिजन्स-AI) म्हणून ओळखले जाते. 

भारतात एआयचा शोध व उपयुक्तता भविष्यातील राहणीमान आमूलाग्रपणे बदलून टाकणारे व तितकेच ऐतिहासिक ठरावे म्हणून या तंत्रज्ञानाचा उपयोग ‘व्यवसाय विस्तार व मूलभूत परिवर्तन’ करण्यासाठी कसा करता येईल म्हणून वेगवेगळ्या पातळीवर विविध योजना राबवीत आहेत.

भारतातील घडामोडी: 

२५ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या देशात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स टास्क फोर्स - AITS’ निर्माण केला असून  आयआयटी मद्रासचे डॉ.व्ही.कामाकोटी (Dr.V.Kamakoti )  हे त्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  तसेच टीसीएसचे (TCS)  डॉ. गौतम श्रॉफ, डॉ.अमरदीसिंग गिल, प्रो.आशिष दत्ता व अन्य या गटाचे सदस्य आहेत.  या गटाची प्रमुख उद्दिष्टे:

१) एआयचा देशांतर्गत आर्थिक फायद्यासाठी वापर. 

२) एआय धोरण व कायदे निर्माण करणे. 

३) सरकारला पंचवार्षिक एआयविषयक सल्ले व शिफारशी.

(Source :-https://www.aitf.org.in/).

या कार्यदलाचे प्रमुख ध्येय आहे भारताच्या आर्थिक, राजकीय आणि कायदेशीर विचारांच्या प्रक्रियेत एआय तंत्रज्ञान अंतर्भूत करून जागतिक एआय अर्थव्यवस्थेतील (AI-Economy) एक पुढारलेला देश बनण्यासाठी योगदान करणे

महाराष्ट्रातील घडामोडी:

महाराष्ट्र सरकारनेही २०१८ मध्ये देशातील एआय कंपन्या, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी व सामाजिक आव्हाने एआय तंत्रज्ञान वापरून सोडविण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्होव्हेशन चॅलेंज’ नावाचा प्रकल्प सुरू केला. निवड झालेल्या एआय कंपन्या, स्टार्टअप्सना सरकारसोबत संयुक्तपणे पायलट प्रकल्प सुरू करायचा असतो. प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण, परिवहन, स्मार्ट सिटी, जलसंवर्धन व दिव्यांगांसाठी खास सुविधा अशा क्षेत्रांत हे होणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी खालील 

(https://ai-innovation.maharashtra.gov.in/)

आपल्या निती आयोगाच्या २०१८ मधील नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अहवालानुसार भारताला एआयसंदर्भात तीन प्रमुख संधी आहेत. 

१) देशांतर्गत आर्थिक संधी व विस्तार 

एआय वापरून इंटेलिजन्ट ऑटोमेशन, भांडवल आणि श्रमात वाढ. मुख्य म्हणजे नवीन उपक्रम, व्यवसाय, रोजगारनिर्मिती. फक्त एआयमुळे आपला जीडीपी १.३ टक्क्याने वाढू शकतो. २०३५ पर्यंत व तितक्याच प्रमाणात रोजगारनिर्मिती.

२) देशांतर्गत सामाजिक विकास व परिवर्तन

माहितीचे लोकशाहीकरण योग्य पद्धतीने झाले की सर्वसामान्य त्याच माहितीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करू लागतात. उदाहरणार्थ, कृषी क्षेत्रात शेतमालाच्या बाजारभावाबद्दल मशीन  लर्निग वापरून अंदाज वर्तविणे व माहिती त्यांच्यासाठी सहजासहजी उपलब्ध करून देणे.

वरीलप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या सामाजिक आव्हाने व एआय तंत्रज्ञान यांची सांगड घालून नवीन प्रकल्प व संशोधन.

३) भारत हे जगाचे एआय केंद्र

एफ. सी. कोहली, ज्यांना आदराने ‘फादर ऑफ इंडियन आयटी इंडस्ट्री’ म्हटले जाते, त्यांनी ४०-४५ वर्षांपूर्वी भारत जागतिक आयटी उद्योगाच्या केंद्रस्थानी राहील असा अंदाज वर्तविला होता. त्यांचे स्वप्न आज नक्कीच खरे झाले असून त्याचप्रमाणे भारत भविष्यात जागतिक एआय उद्योगाच्या केंद्रस्थानी राहील असेही वाटते. जगाला एआय सेवा, सुविधा पुरविण्यातील कमीत कमी ४०% हिस्सा आपण राखू व देशांतून पुरवठा करू, म्हणजे तितकेच आयटी रोजगार व संधी उपलब्ध होतील.

तरीही काहींना अजूनही एआय म्हणजे कविकल्पना किंवा अतिशयोक्ती वाटते. म्हणून खासकरून आपल्याच देशात एआय वापरून अंमलबजावणी झालेली काही सुंदर उदाहरणे आज अस्तिवात आहेत. त्याबद्दल-

१) ऑगस्ट-२०१८ मध्ये अपोलो हॉस्पिटल्स आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांनी मिळून त्यांच्या ग्राहकांसाठी ‘हृदयरोग असण्याची शक्यता वर्तविण्यासाठी’ एआय बेस्ड अलगोरिथम्स वापरून ‘हृदयरोग रिस्क-स्कोरिंग’ प्रणाली विकसित केली. (https://cio.economictimes.indiatimes.com/news/strategy-and-management/heres-how-apollo-hospitals-is-leveraging-ai-to-predict-heart-disease/63874473). 

या प्रकल्पामध्ये आता मधुमेहामुळे येणारे अंधत्व आधीच ओळखण्यासाठीच्या प्रणालीची भर पडलीय. ‘एआय नेटवर्क फॉर हेल्थकेअर’ प्रकल्पाच्या अंतर्गत मायक्रोसॉफ्ट इंडियाने एसआरएल डायग्नोस्टिकसह भागीदारीची घोषणा केली. कर्करोगाचे पूर्वनिदान, रक्त व इतर चाचण्या करायला आलेल्या ग्राहकांसाठी.

२) पंजाब पोलिसांनी ‘पीएआयएस’ (Punjab Artificial Intelligence System-PAIS).नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. यात एआय फेश्यल रेकग्निशन व एनएलपी वापरून तेथील १ लाखाहून अधिक सराईत गुन्हेगार आणि कैद्यांचा डेटाबेस बनविला आहे. गस्त घालताना कोणी इसम संशयास्पद कृती करताना आढळला तर पोलीस स्मार्टफोन वापरून  लगेच तिथल्या तिथे त्याचा फोटो घेऊन पीएआयएस अ‍ॅपमध्ये जाऊन ‘सर्च’ करतात. समोरील व्यक्ती सराईत गुन्हेगार, फरारी तर नाही ना, हे लगेच कळते. (https://www.tribuneindia.com/news/punjab/cops-develop-face-recognition-app-to-nab-gangsters/471032.html)

३) एचडीएफसी बँकेने एआयच्या नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंगवर आधारित ‘एव्हा’(EVA (Electronic Virtual Assistant) नावाची चॅटबॉट सादर केलीय. मार्च २०१८ पासून तिने आजपर्यंत जवळजवळ ३० लाख यशस्वी ग्राहक संवाद पूर्ण केलेत. तसेच चॅटबॉट अनेक भारतीय बँका, वित्तीय संस्था, इतर कंपन्या आपल्या ग्राहक सेवेसाठी वापरत आहेत.

https://m.economictimes.com/industry/banking/finance/banking/hdfc-bank-launches-chatbot-eva-for-customer-services/articleshow/57481943.cms. एसबीआय बँकेची (SBI) ‘सिया’ (SIA - SBI Intelligent Assistant) नावाची चॅटबॉट सुरू असून त्यांच्या काही शाखेत एआयच्या कॉम्प्युटर व्हिजनवर आधारित  फेश्यल रेकग्निशन कॅमेरे लावले आहेत. ते शाखेत आलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्याचा नकळत फोटो काढून बँकेला ग्राहक संतुष्ट की असंतुष्ट असा रियल टाइम प्रतिसाद देतात. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/sbi-deploys-ai-based-financial-solution-sia/articleshow/60835330.cms 

           सन २०३५पर्यंत जगातील ४६% नोकऱ्या व व्यवसाय एक तर पूर्णपणे नवीन, सध्या अस्तित्वात नसलेल्या प्रकारच्या असतील किंवा पूर्णपणे नवीन कौशल्य लागणाऱ्या असतील. वाफेवरील इंजिन, इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटरमुळे जसे नवनवीन व्यवसाय, नोकऱ्या निर्माण झाल्या त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानदेखील (AI) अनेक नवीन व्यवसाय, नोकऱ्या, उद्योगधंदे निर्माण करेल, ज्यासाठी आतापेक्षा जास्त मनुष्यबळ लागेल, पण वेगळे कौशल्य असलेले. विविध क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता-AI) कार्ये बदलेल, रोजगार  नाही.  

विविध व्यवसाय त्यावर बुद्धिमतेमुळे (Artificial Intelligence - AI) भविष्यातील परिणाम व त्यात यशस्वी होण्यासाठी आत्ताच करायचे बदल व संधी:

(१) तंत्रज्ञ क्षेत्र- उदा टेलिकॉम क्षेत्रातील “फील्ड टेक्निशियन”. 

परिणाम : आजकाल आयओटी (IoT) तंत्रज्ञानामुळे सगळी उपकरणे ‘कनेक्टेड’ होत आहेत, त्यामुळे काहीही तांत्रिक बिघाड झाल्यास, नवीन सेवा द्यायची असल्यास दूरस्थ नियंत्रण-कक्षातूनच इंटेरनेटद्वारा सर्व नियंत्रित करता येते. उपकरण हार्डवेअर खराब झाल्यास कुरिअरद्वारा परत मागवता येते. मानवी नियंत्रण कक्षदेखील ऑटोमॅटेड होतील. 

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : घरगुती उपकरणे दुरुस्तीचे कार्यक्षेत्र सोडून क्लिष्ट औद्योगिक उपकरणांकडे वळणे किंवा आयओटी (IoT) टेक्निशियन बनणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

(२) प्रशासकीय क्षेत्र : उदा. बॅक-ऑफिस, कारकुनी रोजगार,  ग्राहकसेवा कर्मचारी

परिणाम : या स्वरूपाच्या कामात सुरुवातीचे संगणकीकरण, मागील दशकातले डिजिटलयुग, सध्याचे रोबोटिक-प्रोसेस ऑटोमेशन व पुढची पायरी म्हणजे चॅट, व्हॉइस-बॉट वापरून ग्राहक संवाद आणि एनएलपी वापरून कागदपत्रे यांत्रिक पद्धतीने हाताळली जात आहेत. त्यामुळे हे क्षेत्रातील रोजगारांना सर्वाधिक धोका आहे. कारकुनी नोकऱ्या भविष्यात अजिबातच उरणार नाहीत असा अनेकांचा अंदाज आहे.

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल :  आहात त्याच क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन अधिकारीपदी, सेल्स, मार्केटिंग किंवा एचआरमध्ये ट्रान्सफर करून घेणे हिताचे ठरेल. सर्वोत्तम म्हणजे आपल्या व्यवहारिक ज्ञानाचा वापर करून एआय ऑटोमेशन प्रकल्पात (AI Automation Project) मध्ये समाविष्ट होणे. उदा: वित्तीय (फायनॅन्स क्षेत्रातील) कर्मचारी वित्त शाखेतील ऑटोमेशन प्रकल्पात सल्लागारपदी संधी उपलब्ध होऊ शकतील.

(३) वैद्यकीय क्षेत्र: उदा.डॉक्टर, पॅरा-मेडिकल, नर्सिंग, हॉस्पिटल कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे हाताळणारे तंत्रज्ञ 

परिणाम : क्षेत्रात हॉस्पिटल कर्मचारी, वैद्यकीय टेक्निशियन, नर्स वगरे कामे  सध्या पूर्णपणे मनुष्यबळ वापरून केली जातात तीदेखील मनुष्य + मशीन अशा स्वरूपात होतील.  उदा : नर्स देखरेख ठेवतात, रीडिंग  घेतात, लिहून दिलेली औषधे देतात व आयव्ही इंजेक्शन वगरे. यातील पहिली तीन कार्य तर आताच स्वयंचलित पद्धतीने होऊ शकतात. तसेच रोबोटिक सर्जरी भारतात आजही उपलब्ध आहे, आणखी पाच-दहा वर्षांत त्याचा झपाटय़ाने प्रसार होईल असे वाटते. पण प्रत्यक्ष डॉक्टरांचे कार्य ? आयबीएम वॉटसनने जगातील पहिली ‘एआय बेस्ड’ वैद्यकीय निदान प्रणाली विकसित केली आहे. थोडक्यात, इथे एक रोबोटिक सॉफ्टवेअर रुग्णाने सांगितलेलं वर्णन, रक्तचाचण्या आणि आयबीएमचा अजस्र हेल्थ डेटाबेस वापरून सर्वात योग्य उपचार पद्धती सुचविते, तेदेखील अशा आजाराबद्दलच्या जागतिक माहितीसकट. पुढे जाऊन एकटेदुकटे वरिष्ठ डॉक्टर अशा रोबोटिक असिस्टंटचा वापर खुबीने करतील. तज्ज्ञांच्या मते १०-१५ वर्षांनंतर ‘ज्युनियर डॉक्टर’ या पेशामधील मागणी हळूहळू कमी कमी होईल.

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : प्रत्येकाने मनुष्य + मशीन मिळून नवीन कार्यपद्धती शिकणे हे ओघाने आलेच. डिजिटल तंत्रज्ञान व हाय-स्पीड इंटरनेट वापरून दूरस्थ गावात, शहरात व्यवसायाची वृद्धी. किंवा रोबोटिक हेल्थ प्रकल्पात सल्लागार. नर्स, पॅरा-मेडिकल इत्यादींनी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त पेशंटशी संवाद, कौन्सेलिंग या कौशल्यांवर भर देणे हे हितावह.

(४) अकुशल व कुशल क्षेत्र : उदा. शारीरिक मेहनतीचे रोजगार

परिणाम : औद्योगिक यांत्रिकीकरणामुळे आधीच इथे मनुष्यबळ कमी लागते आहे, त्यात रोबोटिक यांत्रिकीकरणामुळे जी कामे सध्या मनुष्यबळ वापरून केली जाताहेत तीदेखील हळूहळू नष्ट होतील. 

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : उच्च कौशल्य आत्मसात केल्यास यंत्र-चालक, मशीन-ऑपरेटर अशा स्वरूपाच्या नवीन संधी या क्षेत्रात उपलब्ध होतील.

(५) विक्री व विपणन क्षेत्र: उदा. औषध कंपन्यांचे प्रतिनिधी, फील्ड-सेल्स, रीटेल-सेल्स 

परिणाम : विक्री महसूल भागिले व्यवहार संख्येवर ठरेल मानवी कर्मचारी वि. रोबोटिक ऑटोमेशन. उदा : बँकेच्या छोटय़ा कर्ज विक्रीसाठी रोबॉट, तर मोठी रक्कम, क्लिष्ट अटी व खास ग्राहकांसाठी पर्सनल सेल्स एजंट. 

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : कंपनी-ते-ग्राहक सेल्सकडून कंपनी-ते-कंपनी सेल्स किंवा सर्वोत्तम म्हणजे आपल्या व्यवहारिक ज्ञानाचा वापर करून एआय ऑटोमेशन प्रकल्पात (AI Automation Project) मध्ये समाविष्ट होणे किंवा ऑटोमेशन प्रकल्पात सल्लागारपदी संधी उपलब्ध होऊ शकतील.

(६) वकील व न्यायालय कर्मचारी: 

परिणाम : सध्याचे रोबोटिक-प्रोसेस-ऑटोमेशन व पुढची पायरी म्हणजे चॅट, वॉइस-बॉट (Chat and Voice-BOT) वापरून मानवी संवाद आणि एनएलपी(NLP) वापरून कागदपत्रे यांत्रिक पद्धतीने हाताळली जात आहेत. त्यामुळे कर्मचारी या नोकऱ्या भविष्यात अजिबातच उरणार नाहीत असा तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. आयबीएम वॉटसन व इतर कंपन्यांनी करोडो केस-कागदपत्रे-निकालांचा डेटाबेस, त्यावर मशीन लर्निंग आणि सर्च करताच शिफारस, यशाचा दर अशी उपयुक्त माहिती प्रयोगिक तत्त्वावर देणे सुरू केले आहे. केस-पेपरची नोंद करणे, नवीन कायदेशीर ड्राफ्ट बनविणे ही सर्व कामे कन्टेंट-बॉट (Content-Bot))आजही सहजच करू शकतात.

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : प्रत्येकाने मनुष्य + मशीन मिळून नवीन कार्यपद्धती शिकणे हे ओघाने आलेच. डिजिटल तंत्रज्ञान व हाय-स्पीड इंटरनेट वापरून व्यवसायाची वृद्धी. किंवा रोबोटिक प्रकल्पात सल्लागार. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त ग्राहकांशी संवाद कौशल्यांवर भर देणे हे हितावह.

(७) पत्रकार व लेखक : 

परिणाम: या कार्यक्षेत्रात क्लिष्ट संवाद, भावना व आकलनशक्ती आवश्यकता असल्यामुळे रोबोटिक यांत्रिकीकरणाची शक्यता कमीच वाटते. तरीही फक्त मजकूर वाचून दाखवणारे ‘न्यूज-रीडर’, लिहिणारे ‘कन्टेन्ट-रायटर्स’ वगरे पुढे नाहीसे होतील. 

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल : या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी ‘न्यूज-रीडर’ ते ‘इंटरव्ह्यूअर’ आणि ‘कन्टेन्ट-रायटर’ ते ‘क्रिएटिव्ह-रायटर’ असा प्रवास अनेक जण करू शकल्यास भविष्यात  अनेक संधी उपलब्ध होतील .

(८) अभियांत्रिकी (आयटी तसेच स्थापत्य, उत्पादन)

परिणाम : इंजिनीअरर्सने  विविध प्रकारची केलेले मशीन्स डिझाइनस, त्यांचे उत्पादन, तसेच त्यांना  चालवणे व त्याची देखभाल. आजच्या घडीला डिझाइनस सोडून इतर कामे बरीचशी ऑटोमेट झाली आहेत. आता या मशीन्समध्ये बुद्धिमत्ता आणली जात आहे.  मग भविष्यकाळात त्या मशीन्स आणि सॉफ्टवेअरच डिझाइनचेही काम करतील.

उपलब्ध संधी व त्यासाठी बदल :  संशोधन व नव-उद्योगासाठी काहीतरी नवीन तयार करण्याची लागणारी क्षमता सोडली तर तेच तेच सूचनाबद्ध काम करणाऱ्या इंजिनीअरांचे पुढल्या काळात भवितव्य अंधकारमय आहे . मग ते स्थापत्य (Civil), उत्पादन (Manufacturing) किंवा आयटी (IT) क्षेत्रातले.

         नॅसकॉमच्या(NASSCOM) अवाहालाप्रमाणे भविष्यातले ४६ टक्के रोजगार आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे, नवीन कौशल्याचे असतील. वरील लेखाची मांडणी ही प्रामुख्याने युवा पिढीला भविष्यातल्या आव्हानांची व संधी याची माहिती मिळावी  म्हणून एक छोटासा प्रयत्न. 

दिपक शेडे

- लेखक हे शिवसेनेचे विधानससंपर्कप्रमुख आणि मुख्य निमंत्रक भारतीय कामगार सेना आयटी युनिट चे पदाधिकारी आहेत.