कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते वीटभट्टी कामगारांना स्मार्ट कार्डचे वितरण
अमरावती : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कामगारांसाठी १९ प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीटभट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली वीट बांधकामासाठी प्रथमत: उपयोगात येते. अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे. ‘कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कामगारांच्या सुख-समृध्दीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.
येथील महादेव खोरी परिसरातील वीटभट्ट्यांवर राज्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वीटभट्टी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे स्मार्ट कार्ड वितरीत केले. वऱ्हाड स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कामगार कल्याण आयुक्त विजयकांत पानबुडे, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश देठे यांच्यासह परिसरातील वीटभट्टी कामगार आदी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, वीटभट्टीवर काम करणारा कामगार हा स्थलांतरित असतो. गाव, वस्ती सोडून वीटभट्टयांवर झोपडीत राहून दिवसरात्र काम करीत असतो. रोजच्या दोन वेळेच्या रोजीरोटीसाठी त्याला काम करावे लागते. अशा या वीटभट्टी कामगारांनासुध्दा कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कामगार कल्याण मंडळाद्वारे १९ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मंडळाव्दारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती व संपूर्ण पडताळणी करुन संबंधितांना लाभ देण्यात यावा, असे आदेश त्यांनी कामगार विभागाला दिले.