मुंबई : मंत्रालय तसेच महावितरण चे मुख्य कार्यालय येथे रिक्तपदांवर वर्षानुवर्षे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार भरती करण्याचा मानस मोडीत काढण्याचा निर्धार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या मुंबई कामगारांनी केला.
शनिवार दि १६ जानेवारी २०२१ रोजी मुंबई महावितरण, पारेषण, निर्मिती मधील मंत्रालय, मुख्यकार्यालय प्रकाशगड व धारावी कार्यालयातील वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा माटुंगा लेबर कॅम्प मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात संपन्न झाला.
या मेळाव्याला वीज कंत्राटी कामगार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांनी मार्गदर्शन केले. वीज कामगार महासंघाचे निवासी सचिव प्रशांत भांबुर्डेकर, दत्ता न्हावकर यांचेही मार्गदर्शन कामगारांना लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे अध्यक्ष सुनील कांबळे होते, सूत्रसंचलन अजित नरवणकर यांनी केले. श्रीकांत मगरे, लावण्य गोसावी, प्रदीप गमरे, सविता येळवे, प्राजक्ता गिम्हवणेकर या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २०० कामगार मेळाव्यास उपस्थित होते.
कामगारांनी संघटित होऊन एकजूट ठेवल्यास त्यांचे नुकसान होणार नाही, ३ राज्यव्यापी आंदोलने करून देखील उर्जामंत्री, प्रधान सचिव यांचे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष होत असून पुढील आठवड्यात प्रधान सचिव यांच्या स्तरावर मंत्रालयात मिटिंग बोलावली जाईल असे मंत्रालयातुन ऊर्जा विभागाचे सहसचिव वाळुंज यांनी कळविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.