कामगार कायद्यांमधील बदलांविरोधात मानवी साखळी द्वारे एल्गार


केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल केले आहेत. यामुळे कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात गुरुवारी (दि. २६) संप करण्यात येणार आहे.

         संपामधील प्रमुख मागण्या आणि सरकारची धोरणे याबाबत तपशीलवार माहिती देण्यासाठी 'शेतकरी -कामगार विरोधात मोदी सरकार' पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. शिवाय मोठ्या प्रमाणात संयुक्त आणि स्वतंत्र पत्रकांद्वारा कामगार-कर्मचाऱ्यांपर्यंत संपाची भूमिका पोचविण्यात आलेली आहे.

          संपामध्ये इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, युटीयुसी इत्यादी सर्व केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न तसेच स्वतंत्र कामगार संघटना, बँका, विमा, पोस्ट, संरक्षण, वीज मंडळ इत्यादी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, अंगणवाडी-आशा, आरोग्य परिचारक तसेच सर्व योजना कर्मचारी, मार्केट यार्ड संबंधित सर्व कर्मचारी, हमाल आणि घरकामगार उस्फूर्तपणे व पूर्ण ताकदीने या संपामध्ये उतरणार आहेत

        सध्याच्या करोना आपत्तीमुळे संपाच्या दिवशी कामगार-कर्मचारी तोंडाला मास्क बांधून, रस्त्याच्या दोन्ही बाजूस ओळीने, रहदारीस कोणताही अडथळा न करता, हातात मागण्यांचे फलक धरून योग्य त्या अंतरावर उभे राहणार आहेत.