कंपनीतील दुर्घटनांसंदर्भात कायद्यात सुधारणा करणार - कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांसंदर्भात कामगारांच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात (दि. 5) सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजू तोडसाम, नाना पटोले, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला.

    कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी तेथे जाऊन याप्रकरणी तपासणी करतात. तपासणीअंती अहवाल सादर करतात. कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदानाची रक्कम लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

    चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.