यवत : यवत (ता. दौंड) येथील अनुराज शुगर कारखान्यावरून कमी केलेल्या ८४ कामगारांना तत्काळ कामावरती रुजू करावे, असा आदेश पुणे येथील सहायक कामगार आयुक्त त. श. अत्तार यांनी दिला असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
यासंदर्भात पुणे येथे अतिरिक्त कामगार आयुक्त कार्यालयात कारखाना प्रशासन व कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये गुरुवारी (ता. १४) बैठकीचे आयोजन केले होते. त्याला अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, 'महानंद'च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, कामगार प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, कैलास दौंडकर, अनिल थोरात, संदीप खेडेकर आदी पदाधिकारी; तर कारखाना प्रशासनातर्फे टाइम कीपर उपस्थित होते.
यासंदर्भात सहायक कामगार आयुक्तांनी दिलेल्या पत्रामध्ये, अनुराज कारखान्याचे संचालक किंवा व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. याबाबत अतिरिक्त कामगार आयुक्तांनी नाराजी दर्शवल्याचे नमूद केले. शिवाय ८४ कामगारांना कामावरून कमी करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नाही. नैसर्गिक न्यायतत्त्वांनुसार बचावाची संधी न देता तत्काळ कामावरून कमी केले आहे. या संदर्भीय पत्राच्या आधारे ८४ कामगारांना तत्काळ कामावर रुजू करण्याचे सूचित केल्याचे नमूद केले आहे. तसेच, या संदर्भात अतिरिक्त कामगार आयुक्तांसमोर (पुणे) २५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता बैठकीचे आयोजन केल्याचे निर्देशित केले आहे.
अनुराज शुगर कारखान्यातून ८४ कामगारांना कामावरून बडतर्फ केल्याप्रकरणी व इतर मागण्यांवरून गेल्या ३१ ऑगस्टपासून कारखान्यातील ८४ कामगार अनुराज शुगर परिसरामध्ये ठिय्या आंदोलनासाठी बसले होते. 'महानंद'च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी या आंदोलनाला भेट दिली व याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अजित पवार यांनी कारखाना कामगार व प्रशासन यांची बैठक लावण्याबाबत अतिरिक्त कामगार आयुक्तांना निर्देश दिले. त्यानुसार झालेल्या बैठकीत वरील आदेश दिला.