नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बहुराष्ट्रीय कंपनी एबीबी इंडिया लिमिटेडने आपल्या कामगारांना भरघोस पगारवाढ देऊन मकर संक्रांतीची गोड भेट दिली आहे. एबीबी व्यवस्थापन आणि स्वर्गीय दत्ता सामंत प्रणित असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग वर्कर्स यांच्यात करार संपन्न झाला आहे असे वृत्त इंडिया दर्पण वृत्तसंस्थेने दिले आहे.
हा करार साडेचार वर्षांसाठी (१ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२७) या कालावधीसाठी आहे. या कराराद्वारे कामगारांना मासिक वेतनात तब्बल रू.२३,७००/- एवढी पगारवाढ मिळणार आहे. त्याशिवाय अधिक प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह रु. ४००/- सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच, कामगारांना महिन्याकाठी रु. २४,१००/- ची थेट पगारवाढ मिळणार आहे. या व्यतिरिक्त प्रोव्हिडंड फंड व ग्रॅच्युटीचे लाभ देखील मिळणार आहेत. त्याशिवाय कंपनीकडून कामगारांना दिवाळी ऍडव्हान्स, गृह कर्ज, शूज, जॅकेट, शिफ्ट अलाउन्स इत्यादी सुविधा देखील मिळणार आहेत.
प्रस्थापित कराराचा ४१ दिवस कालावधी शिल्लक असताना देखील सदर कालावधीची वेतनवाढ आगाऊ स्वरूपात देऊन व्यवस्थापनाने कामगारांना सुखद धक्का दिला आहे. कामगारांनी सुरक्षा, नैतिकता, अनुशासन व कार्यक्षमता यांचा अंगीकार करून कंपनीच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलल्याने सदरची पगारवाढ करण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनी नमूद केले.
सदर करार यशस्वी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संमतीने घडवून आणण्यात युनियनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष भूषण सामंत, सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाध्यक्ष वर्गीस चाको, स्थानिक पदाधिकारी मनोज पवार, देवेंद्र पाटील, मेघराज अहिरे, हंसराज पवार, तुषार निकम तर व्यवस्थापना च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे ,HR मॅनेजर दयानंद कुलकर्णी, राहुल बढे, मनोज वाघ, रोहन घोगरे आदींनी मोलाचा सहभाग दिला.
करार स्वाक्षरी होताच सर्व कामगार सहकाऱ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन अतुल जाधव, महेश धार्मिक व मनोज हाडोळे आदींनी केले व सूत्रसंचालन किरण घोलप आणि रोहन सगर यांनी केले. मेघराज अहिरे यांनी आभार मानले.