माथाडी संघटनेच्या नावाखाली शहरातील ओैद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. खंडणीसाठी धमकी आल्यास उद्योजक, व्यापाऱ्यांनी त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी बैठकीत केले असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
शहरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, उद्योजक, व्यापाऱ्यांना माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकावून खंडणी उकळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा चेंबर ऑफ काॅमर्स, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत विविध संघटनांचे १०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा, अमोल झेंडे, विजयकुमार मगर, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त राजेंद्र साळुंके, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तसेच माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते आदी या वेळी उपस्थित हाेते.
शहरातील औद्योगिक वसाहतीत माथाडी संघटना तसेच विविध संघटनांच्या नावाखाली व्यावसायिक, उद्योजकांना धमकावून खंडणी उकळण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खंडणीस नकार दिल्यानंतर मालाची ने-आण करणाऱ्या कामगारांना धमकावून वेठीस धरले जाते. माथाडी संघटनेच्या नावाखाली पैसे उकळले जातात तसेच अडवणूक केली जाते, अशा तक्रारी या बैठकीत उद्योजक, व्यावसायिकांकडून करण्यात आल्या.
वर्गणीच्या नावावर खंडणी उकळली जाते. माथाडी कामगारांच्या मजुरीचे दर ठरवून देण्याची आवश्यकता आहे. वाहतूक विषयक समस्या सोडविण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, 'माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागितल्यास न घाबरता नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्वरीत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.' माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते यांनी माथाडी कामगार कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. माथाडी मंडळाकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी असून काही तक्रारी असल्यास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन मते यांनी केले.