माथाडींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन

- पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटीलांचा इशारा

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे नवीन सरकार दुर्लक्ष करत असून वारंवार निवेदन देऊनही अद्याप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, कोणतीही बैठक घेण्यात येत नाही, त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ फेब्रुवारीला हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. 

    या संपाला व्यापाऱ्यांनाही पाठिंबा दिला असून नवी मुंबई एपीएमसीतील ५ बाजार तसेच इतर भागात समितीही या संपात सहभागी होणार आहेत. आंदोलनानंतर ही सरकारने लक्ष घातले नाही, तर अधिवेशनाच्या तोंडावर रस्त्यावर उतरून आणखीन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

    वाशीत माथाडी भवनात झालेल्या पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. नवीन सरकार येवून सहा महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र सरकारला वारंवार निवेदन देवूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. ९ जानेवारी रोजी माथाड यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री कामगार मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या बाबत अवगत केले आहे. तरी देखील अद्याप सरकारकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही . कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यात येत नाही . त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा निर्णय माथाडी कामगार संघटनेने घेतला आहे. येत्या २७ फेब्रुवारी पर्यंत कोणता निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र असेल. 

    आताचे सरकार माथाडींचे विषय सोडायला अपयशी ठरले आहेत. सरकार कोणतेही असोत, मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही आंदोलन करणारच, माथाडी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. बाजार समितीत चालेल सावळा गोंधळ थांबणार का? मी सरकार बघत नाही माथाडी कामगार बघतो असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे. माथाडी कामगार संघटना ही मोठी चळवळ आहे.