जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने त्रिपक्षिय समितीच्या वेतन करारानुसार कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय गुरुवार ता.०२ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले.
शेरकर म्हणाले की,कारखान्यातील कायम कामगारांमधून एक कार्यलक्षी संचालक नियुक्त करावयाचा असतो. या पदासाठी सर्व कामगार,अधिकारी व संचालक मंडळाने एकमुखाने शिफारस केल्यामुळे ज्येष्ठ कर्मचारी व मिलफोरमन बाळकृष्ण सखाराम चाळक यांची कार्यलक्षी संचालक पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे चाळक यांना संचालक मंडळात कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.तसेच कामगार युनियनच्या सभेत राजेश सोपान कुर्हे यांची कामगार युनियनचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. या दोघांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यंदाच्या हंगामात विघ्नहर कारखान्याचे सुमारे १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून २०२१-२२ चा गाळप हंगाम २० ऑक्टोबर २१ पासून सुरु झाला आहे. विघ्नहरचे गाळप पुर्ण क्षमतेने सुरु आहे. आज अखेर विघ्नहरने दोन लाख ५१ हजार ७९० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.मागील सुमारे पाच वर्षांपासून साखर कारखानदारीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अशात यंदांच्या गाळप हंगामावर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.
त्रिपक्षीय समितीचे करारानुसार विघ्नहरच्या कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वेतनवाढ १ नोव्हेंबर २१ च्या पगारापासून अदा करण्यात येणार आहे.वेतनवाढीच्या फरकाची होणारी रक्कम कामगारांना टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कामगारवर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.वेतनवाढीबद्दल कामगार युनियनच्या वतीने अध्यक्ष सत्यशिल शेरकर उपाध्यक्ष अशोक घोलप व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.