महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या २०० कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन

नाशिक: इगतपुरी येथील महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीत (Mahindra and Mahindra Company) १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सुमारे स्थानिक दोनशे कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शनिवार ५ जून पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, कंपनीने आंदोलनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत बाहेरील कामगार आणून या सर्व बाहेरील कामगारांची कंपनीतच राहण्या-खाण्याची सोय केल्याने व काम चालू ठेवल्याने स्थानिक कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलनाविषयीचे निवेदन तहसीलदार व इगतपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

सुमारे २०० कामगार गेली दहा ते पंधरा वर्षांपासून कंत्राटद्वारे चार चाकी निर्मिती करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत काम करत आहेत. परंतु कंपनीने आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. कामगार ५ जूनपासून कंपनीसमोर गेटवर दररोज येतात. परंतु कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांना डावलून नाशिक येथून अन्य कामगारांना आणत आपले काम सुरू ठेवले आहे. सर्व स्थानिक कामगारांना त्रास देऊन कंपनी व्यवस्थापन षडयंत्र रचत आहे, असा आरोप या कामगारांनी केला आहे. 

दरम्यान,याप्रकरणी कामगारांनी तहसीलदार कंपनी व्यवस्थापनला त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कामगारांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळावा, ग्रॅज्युईटी मिळावी, क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेऊ नये, पगारी सुट्टी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सत्यवान वारघडे, चंद्रकांत भागडे, दत्तात्रय चौधरी, धनराज परदेशी, हेमंत पाटें, सोपान चव्हाण, वैभव पवार, प्रकाश गोळे, विश्वास भोईर, गुरुनाथ अवघडे आदींच्या सह्या आहेत.