कोविड संदर्भात मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांसोबत संवाद
मुंबई : कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (दि.६ जून) सांगितले. राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, सीआयआयचे माजी अध्यक्ष उदय कोटक, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर, सीआयआयचे नियुक्त अध्यक्ष आणि बजाज फिनसर्वचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष बी. थियागराजन, पिरामल उद्योग समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, लार्सन आणि टुब्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन सुब्रमन्यन, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिष शाह, आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका, टाटा सन्स लिमिटेड चे इन्फास्ट्रक्चर, डिफेंस आणि एरोस्पेस चे अध्यक्ष बनमाली अग्रवाल, हिरानंदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उद्योजक रमेश शाह, नौशाद फोर्ब्स, बोमन इराणी, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी आदी उद्योजक उपस्थित होते.
कामगारांचे लसीकरण व सुविधा उभाराव्यात
आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, आणि कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
परराज्यातून येणाऱ्या कामगारांची सात दिवस विलगीकरण
पावसाळ्याशी संबधित आजारांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठून देण्याचे आवाहन केले. बाहेर राज्यातून येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्यात यावी, तसेच बाहेर राज्यातून आल्या नंतर सात दिवस अलगिकरणात ठेऊन त्यांची योग्य तपासणी झाल्यानंतरच त्यांना कामावर घ्यावे. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
छोट्या व मध्यम उद्योजकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघू व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
श्री.देसाई म्हणाले, मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपहारगृहाची सोय देऊ शकतात मात्र छोट्या उद्योजकांकडे कामासाठी येणारे १५-२० हमाल आणि इतर कामगार येतात अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपहारगृह चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
उद्योजक काय म्हणाले ?
- निर्बंधांसंदर्भात निकष आणि लेव्हल्स (पातळ्या) चा निर्णय चांगला आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित आहे.
- विशेषत: ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजकांनी मदत करण्याची व योगदान देण्याची तयारी दर्शविली
- उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटीत वर्गाचे लसीकरण व इतर काळजी घेणे आवश्यक
- आयटी क्षेत्राने वर्क फ्रॉम होमवर पुढील काही महिने भर द्यावा
- उद्योग व कारखान्यांत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण, चाचणी याबाबत वर्गीकरण करावे
- तिसऱ्या लाटेत आर्थिक व्यवहार बंद होऊ नयेत
- उद्योगांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचेच नाही तर त्यांच्या परीवारांचेही लसीकरण जलद गतीने करावे
- लसीकरणाला जनतेचा प्रतिसाद वाढविण्यासाठी अगदी तळागाळात जाऊन लोकशिक्षण करावे
- बांधकाम क्षेत्रात काम करणारे तसेच कामगार यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.
- मुंबई खूप मोठी आहे त्यामुळे निर्बंधांच्या बाबतीत अगदी लहान लहान कंटेनमेंट झोन्सवर भर द्यावा
- पहिल्या पातळीमध्ये आपण लोकांना विविध कारणांसाठी, समारंभ, कार्यक्रमासाठी अधिक संख्येने
उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे, त्याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे
- रस्त्यांवर पोलिसांचे चेक पोस्ट हटवावे म्हणजे वाहतूक संथ होणार नाही व गर्दी टळेल