पुणे : पिरंगुटजवळ असलेल्या उरवडे येथील SVS AquaTechnologies या कंपनीत ही आगीची घटना घडली आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत ४३ कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. यापैकी १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आगीत कंपनीतील १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.