कामगारांनी स्थलांतर करू नये, कामगार वर्गाचे वेगाने होणार लसीकरण : पंतप्रधान

Workers should not migrate, working class will be vaccinated faster : PM Narendra Modi

नवी दिल्ली : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगार वर्गाला स्थलांतर न करण्याचं आवाहन करताना त्यांना वेगानं लस मिळेल तसेच त्यांचा रोजगारही टिकून राहिल याची खात्री देण्याचा प्रयत्न केला. देशाला संबोधित करताना मोदींनी मंगळवारी (दि.२० एप्रिल) विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मोदी म्हणाले कि, कामगारांना विश्वासात घ्यायला हवे, कामगार सध्या ज्या शहरात आहेत, तेथेच राहावे, असे सांगण्यात यावे. कामगार आणि शेतकऱ्यांचं प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या, आपण कोरोना महामारीला लढा देतोय, पहिल्या लाटेवेळी आपल्याकडं अनेक साधनसामुग्रींचा अभाव होता. आता, परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या सहभागातूनच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. गेल्यावर्षी जी परिस्थिती होती ती आजपेक्षा खूपच वेगळी होती. तेव्हा आपल्याजवळ या जागतिक महामारीशी लढण्यासाठी खास वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हती. त्यावेळी कोरोनाच्या चाचण्यांसाठी पुरेशा लॅब नव्हत्या. पीपीई कीटचं काहीही उत्पादनं नव्हतं. या आजारावरील उपचारांसाठी आपल्याकडे काही विशेष माहितीही नव्हती. तरीही खूपच कमी कालावधीत आपण या गोष्टींमध्ये सुधारणा केल्या. आज आपल्या डॉक्टरांनी कोरोनावर उपाचारांची चांगलं कौशल्य मिळवलं आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

लसीकरणासाठीही आपण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता १ मे पासून १८ वर्षांपासूनच्या सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे, शेतकरी आणि कामगार वर्गाला लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. म्हणून, कामगारांनी आहे त्याच जागी राहावे, स्थलांतर करू नये, असे आवाहनही मोदींनी आपल्या भाषणात केलंय.