साखर कामगारांच्या पगारवाढ निर्णय २६ फेब्रुवारी रोजी ?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या  त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.११ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्य साखर संघाचे कार्यालयात संपन्न झाली.

     मुंबई येथे झालेल्या बैठकीत साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये साखर कामगार कामगारांना ४० टक्के पगारवाढीची मागणी तसेच अंतरिम पगारवाढी ऐवजी अंतिम पगारवाढ द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीत पगारवाढीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

      बैठकीत साखर कामगार आयुक्त साखर आयुक्त शेखर गायकवाड,कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून अशोक कारखान्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, कादवा कारखान्याचे चेरमन तसेच महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, चंद्रदीप नरके, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, बी.बी.ठोंबरे, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून कादवा कारखान्याचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कामगार प्रतिनिधी डी.डी वाघचौरे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन (इंटक) चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ.सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ.आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, सदस्य सचिव तथा कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे ऑनलाइन सहभागी झाले होते.