जनरल मोटर्स कामगारांचा रोजगार कायम राहिला पाहिजे हि शासनाची जवाबदारी

तळेगाव, पुणे :  पुणे येथील जनरल मोटर्स (General Motors) कामगारांचा रोजगार येणाऱ्या नवीन कंपनी मध्ये कायम राहावा अशी मागणी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून सुमारे ७० आमदार व काही खासदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून केली असून विविध संघटना देखील कामगार यांना पाठिंबा देत आहे.

        एखादी मोठी कंपनी जेव्हा राज्यात येते तेव्हा राज्यसरकार त्यांना विविध सवलती, सूट देते त्या पद्धतीने MOU केले जातात. काही वर्ष कंपनी चालवायची शासनाच्या सोयी-सुविधा यांचा पूर्णपणे फायदा घ्यायचा व नंतर १० ते १५ वर्षांमध्ये कंपनी बंद करून दुसऱ्या कंपनीला विकून टाकायची व तेथील कामगार वाऱ्यावर सोडायचे या पद्धतीने महाराष्ट्र मध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वातावरण तयार होत असुन, आजचा रोजगार उद्या राहील का नाही याची शाश्वती कामगार वर्गाला नाही, यामुळे संपूर्ण कामगार वर्ग भयभयीत झाला आहे.  

       जनरल मोटर्स कामगारांच्या प्रश्नामुळे कंपनी बंद करून कामगाराने वाऱ्यावर सोडणे हा प्रश्न ऐरणीवरती आला असून शासनाने याची दखल घेऊन कंपनी, उद्द्योग यांच्या बरोबर MOU करताना याचा विचार करणे गरजेचे आहे.

       तसेच जनरल मोटर्स (General Motors) मधील कामगारांचा रोजगार कायम राहावा याच्यासाठी जर सुमारे ७० लोकप्रतिनिधी आमदार, खासदार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांना पत्र लिहून कळवत असतील तर शासनाने यांची दखल घेऊन या कामगारांचा रोजगार कायम राहील असे सांगणे व त्याची जवाबदारी घेणे महत्वाचे असुन शासन देखील कामगार यांच्या मागे ठामपणे उभे आहे हे दाखवणे गरजेचे आहे.