भारत फोर्ज कामगार संघर्षाच्या पवित्र्यात


पुणे : भारत फोर्ज चाकण कंपनीतील १६७ कामगारांना कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीचे कारण देऊन दिनांक १८ ऑगस्ट २०२० पासून ले-ऑफ दिला असून सदर प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

        कामगारांना देण्यासाठी काम नसल्याचे कारण न्यायालयास दाखवून ले-ऑफ चे समर्थन कंपनीने केले होते. परंतु ले-ऑफ च्या काळात ट्रेनी कंत्राटी कामगारांच्या नेमणुका करून प्रॉडक्शन ची कामे नियमित चालू आहेत. यातून व्यवस्थापनाचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने व्यवस्थापनास दिनांक २९ डिसेंबर २०२० च्या पत्राद्वारे ले-ऑफ रद्द करून १६७ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे असे सांगितले असून व्यवस्थापनाने ते मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

        त्याच प्रमाणे मुंढवा भारत फोर्ज मध्ये तब्बल १७ महिने वेतनवाढीची मागणी प्रलंबित आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अति उत्तम आहे. तसेच कोरोना च्या काळातील कंपनीचे कामकाज पूर्वपदावर आलेले असताना कामगारांच्या मागणीकडे व्यवस्थापन नकारात्मकच आहे. 

        त्यापेक्षा कामगार कपातीचा मुद्दा व्यवस्थापनास महत्त्वाचा वाटत असून कामगार कपात करण्यासाठी युनियनने सक्रिय पाठिंबा देण्याचा हट्ट व्यवस्थापनाचा आहे. कामगार कपात करणे हे कार्य युनियनच्या कार्यकक्षेत नसताना व्यवस्थापन अवास्तव मागणी युनियन कडे करीत असल्याने संघटनेच्या वतीने अखेर आपल्या मागण्या पदरात पाडण्याकरिता उपोषणाचे हत्यार बाहेर काढले असून दिनांक ५ जानेवारी २०२१ पासून युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष साबळे उपोषणास प्रारंभ करणार असल्याचे पत्र युनियनने दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी  व्यवस्थापनास दिलेले आहे. अशी माहिती श्रमिक एकता महासंघचे रोहित पवार यांनी दिली.