आंध्र प्रदेशात कामगारांना आता 10 तासांची ड्युटी, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारचा निर्णय

आंध्र प्रदेश सरकारने व्यवसाय वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कामाचे तास वाढविले आहेत. त्यामुळे राज्यातील कामगार आणि नोकरदारांना 10 तास काम करावे लागेल. आतापर्यंत येथे कामाचे कमाल तास नऊ होते असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.

     कामगार कायदे आणि गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री के. पार्थसारथी यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना पार्थसारथी म्हणाले की, आतापर्यंत कलम 54 अंतर्गत एका दिवसात जास्तीत जास्त नऊ तास काम करण्याची परवानगी होती. आता ती वाढवून 10 तास करण्यात आली आहे. पूर्वी पाच तास काम केल्यानंतर एक तास विश्रांती दिली जात होती, ती आता सहा तासांनंतर करण्यात आली आहे. आतापर्यंत 75 तास ओव्हरटाईम करण्याची परवानगी होती, मात्र आता प्रत्येक तिमाहीत 144 तासांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

अतिरिक्त काम केल्यास उत्पन्न वाढेल

अतिरिक्त काम करता तेव्हा तुमचे उत्पन्न वाढते. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. सरकारचा नवीन निर्णय महिला सक्षमीकरणातही योगदान देत असून रात्रीच्या शिफ्टसाठीचे नियमही शिथिल केले आहेत. जेणेकरून अधिकाधिक महिला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू शकतील. पूर्वी महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती; परंतु आता त्या वाहतूक सुविधा, सुरक्षा आणि देखरेख यासारख्या सुरक्षिततेच्या उपायांसह काम करू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले.