सेवानिवृत्तांना किमान नऊ हजार निवृत्तीवेतन द्या

शाहू छत्रपती यांची मागणी: केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कर्मचारी निवृत्ती योजना - १९९५ (ईपीएस ९५) अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्ती वेतन दरमहा ९ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडावे, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सर्व माहिती ऐकून घेऊन लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले असे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.

पेन्शन महागाईपासून संरक्षित नाही आणि गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. पेन्शनधारकांची दयनीय अवस्था आहे. त्यांना किमान १,४५१ रुपये इतके तुटपुंजे निवृत्ती वेतन दिले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे, याकडे मंत्री मांडवी यांचे लक्ष वेधले. 

     निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'पेन्शन फंड' मधील कॉर्पस वाढला आहे. २०१७-१८ मध्ये ३ लाख ९३ हजार कोटी वरून २०२२- २३ मध्ये सात लाख ८० हजार कोटी इतकी रक्कम वाढली आहे. सन २०२२-२३ मध्ये पेन्शन कॉर्पसवर ५१ हजार कोटी रुपयांचे व्याज मिळाले. पण वाटप करण्यात आलेली १४ हजार ४०० कोटी पेन्शन तुटपुंजी होती. मिळालेल्या व्याजाची रक्कम दरमहा किमान पेन्शन ९ हजारपर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधले.