कामगार कायदा सुधारणा ही काळाची गरज डॉ.श्री.एस.सी.श्रीवास्तव यांचे प्रतिपादन

पुणे : आगामी काळामध्ये कामगारांच्या कायद्यामध्ये तरुण संशोधकांनी संशोधन करण्याची गरज आहे. कामगार कायदा सुधारणा ही काळाची गरज आहे, असे मत कामगार कायदे मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. सी. श्रीवास्तव यांनी व्‍यक्‍त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, कामगार कायदे परिषद, फेडरीच इबर्ट स्टिफंग, मेहता विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन झाले. त्‍याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आंतरराष्ट्रीय विधी व संशोधन विद्यापीठ, गोवाचे प्र-कुलुगरू डॉ. व्यंकटराव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नईचे प्र-कुलुगरू डॉ. संतोषकुमार, पुणे येथील उद्योग व कामगार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश सुधीरकुमार बुक्‍के, डीईएसचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांच्‍या उपस्थितीत झाले.

कामगारांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी वेळोवेळी कायद्यांमधील तरतुदी ह्या गरजेच्या आहेत, असे मत सुधीरकुमार बुक्‍के यांनी व्‍यक्‍त केले.

विविध मान्यवरांनी कामगार व त्यांच्याविषयी कायद्यामध्ये होणाऱ्या बदलांविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा यादव यांनी केले, तसेच आभार प्रा. पूजा देव यांनी मानले.