कामगारांच्या आंदोलनाला १५ दिवस उलटूनही न्याय नाही

बल्लारपूर : तालुक्यातील बामणी या गावातील प्रसिद्ध बामणी प्रोटीन्स लिमिटेड या उद्योगावर कंपनी व्यवस्थापनातर्फे २० मे रोजी बेकायदेशीर ताळेबंद करण्यात आली. कामगार युनियन, शासन किंवा कामगारांना कोणतेही पूर्व सूचना न देता उद्योगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोटीस चिपकवून गेटला टाळे लावण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर कामगार युनियन भारतीय केमिकल वर्कर्स युनियन तर्फे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. तसेच सोबतच लोकप्रतिनिधी, संबंधित कामगार विभाग आणि कामगार मंत्रालयाला सुद्धा याबाबत पत्र लिहून सदर विषयाच्या बाबतीत कळवण्यात आले.

      विषयाचे गांभीर्य ओळखुन शासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु व्यवस्थापनाकडून उद्योग सुरू करण्यासंबंधी कोणत्याही सकारात्मक पद्धतीने वाटचाल झालेली नाही. बल्लारपूर तालुक्यातील या बंद पडलेल्या उद्योगामुळे परिसरातील गावांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बहुतांश कामगार परिसरातील गावांमधून असल्यामुळे व्यवस्थापनाचा विरोधात गावातील लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. उद्योग बंद झाल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे परिसरातील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. शासन स्तरावरून कोणतीही अडचण नसताना, उद्योग नफ्यात असताना व्यवस्थापन हिटलर शाहीचा वापर करून कामगारांना वेठीस धरत आहे. 

     जर या विषयावर लवकरच तोडगा निघाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, व्यवस्थापनाकडून निर्णय घेण्यात विलंब होत असल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला याउलट कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या भविष्याचा आणि त्यांच्या मुलाला बाळाच्या शिक्षणाचा, उदरनिर्वाहाचा विचार न करता व्यवस्थापनातर्फे २१ जुलै पर्यंत कामगारांचा खात्यात त्यांची ठरवण्यात आलेली एकतर्फा देय रक्कम  टाकून उद्योग पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. कामगार युनियन यांचे म्हणणे आहे की शासनाने यावर त्वरित दखल घेऊन व्यवस्थापनावर दबाव आणून सकारात्मक तोडगा काढण्यास प्रयत्न करावे जेणेकरून जिल्ह्यातील आणखी एक उद्योग बंद होण्यापासून वाचेल आणि कामगारांच्या भविष्याचा उदरनिर्वाहाचा आणि त्यांच्या मुलानं बाळांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही.