कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन : आमदार सुनील शेळके

मावळ : महिंद्रा लॉजिस्टिकच्या (Mahindra Logistics Limited) कामगारांबाबत अद्यापही कंपनीने ठोस निर्णय घेतलेला नाही. कामगार हे स्थानिक भूमिपूत्र आहेत. त्यांना कंपनीने वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाही. या कामगारांबाबत कंपनी व्यवस्थापनाने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गर्भित इशारा आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी दिला असे वृत्त एमपीसी न्यूज ने दिले आहे.

कान्हे ( ता. मावळ) येथील महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (Mahindra Logistics Limited) कंपनीच्या २०५ कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. तालुक्याच्या बाहेर नोकरी न देता स्थानिक ठिकाणी नोकरी देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. एप्रिल २००८ मध्ये जनरल मोटर्समध्ये महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी सुरू झाली होती. तेव्हापासून मावळ तालुक्यातील २०५ स्थानिक भूमिपुत्र कायमस्वरूपी काम करत आहेत.

जनरल मोटर्स कंपनी डिसेंबर २०२० रोजी बंद झाल्याने या २०५ कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये महिंद्रा लॉजिस्टिकच्या वतीने बैठक घेऊन कामगारांना कायमस्वरूपी पुणे जिल्ह्यात आहे त्या वेतनात नोकरी देतो, असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, २४ फेब्रुवारी रोजी महिंद्रा लॉजिस्टिकने एक वर्षाच्या मुदतीवर नव्याने नियुक्ती तसेच पूर्वीच्या पगारात ५० टक्के वेतन कमी केले. जाण्यायेण्यासाठी बसची व्यवस्था केली नाही. याच्या विरोधात कामगारांनी एप्रिल महिन्यात आंदोलन केले होते.