पिंपरी : शासकीय सेवांचे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून त्यामुळे तरुणांच्या रोजगारावर आणि भविष्यावर दूरगामी परिणाम झाले आहेत. कंत्राटी पद्दतीने शिक्षकांची भरती करण्याचा जीआर रद्द करणार असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंत्राटी शिक्षक भरतीचा जीआर रद्द केला, आता कंत्राटी कामगार पद्दतही रद्द करा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
मोरवाडी, पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्यने कामगार उपस्थित होते.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले, कंत्राटी कामगार कुठे असावेत त्याचे काही नियम आहेत. तात्पुरत्या कामासाठी कंत्राटी कामगार असावा, यासाठी कायदा आला. त्यानंतर उत्पादन प्रक्रियेत कंत्राटी कामगार लावण्याचे फ्याड आलं. गेली 15-20 वर्षात त्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांचे भविष्य अंधारात गेले. या कंत्राटीकरण कायद्याचा दुरुपयोग सुरू झाला.
शासकीय आणि खाजगी कार्यालयातील कंत्राटी कामगारांचे ठेके बऱ्यापैकी गुंडांनाच दिले जातात. कंत्राटी कामगारांना किमान 22 हजार पगार मिळाला पाहिजे, पण त्यांच्याकडून आठ हजारावर काम करवून घेतले जाते. यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. त्याबाबत महापालिकेत आयुक्तच कायदे पाळायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. देशात व राज्यात 90 टक्के सरकारी व खाजगी नोकऱ्याचे कंत्राटीकरण झाले आहे, असेही भोसले म्हणाले.
यावेळी कंत्राटी भरतीचा भयंकर जीआर मागे घेतल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्येक्त करण्यात आले. कंत्राटीकारणाचा मागच्या सरकारने जीआर केला होता. तो जीआर या सरकारने रद्द केला, भाजप राजवट 100 टक्के कंत्राटी पद्धत बंद करील, असा विश्वास वाटतो.
शासकीय व खाजगी क्षेत्रात नोक-या असूनही लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत, कारण त्या नोक-यांचे कंत्राटीकरण झाले आहे. खासगी उद्योगात 97 टक्के कंत्राटी कामगार आहेत. खासगी उद्योगात पण कंत्राटी कामगार पद्धत बंद करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांनी एकमेकांना लाडू भरवून जल्लोष करत आनंद साजरा केला.